नवीन पिढी घडविण्यात अंगणवाडी सेविका, मदतनीसांची भूमिका महत्त्वाची

नवीन पिढी घडविण्यात अंगणवाडी सेविका, मदतनीसांची भूमिका महत्त्वाची
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते १९ जणांना नियुक्ती आदेश
लातूर, दि. ७ : बालकांच्या जडणघडणीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्यांच्या माध्यमातून भविष्यातील सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
शिरूर ताजबंद येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, अहमदपूर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अहमदपूर तालुक्यातील ४ अंगणवाडी सेविका आणि १५ मदतनीस अशा एकूण १९ जणांना सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर बालकांच्या संगोपनासोबतच त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक जडणघडणीची जबाबदारी असते. बालकांना आईच्या ममतेप्रमाणे प्रेम आणि आपुलकी देतानाच त्यांच्यात शिस्त व संस्कार रुजविण्याचे कामही करावे लागते. या माध्यमातून देशाची सुसंस्कृत आणि सक्षम पिढी घडविण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन सहकारमंत्री पाटील यांनी केले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती उत्तमराव माने, अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज पाटील, उपसभापती आयोध्या केंद्रे, उपनगराध्यक्ष अय्याज शेख, जिल्हा परिषद सदस्य प्रफुलचंद्र गुंडरे, अश्विन नागराळे, गटविकास अधिकारी पंकज शेळके, सहाय्यक गटविकास अधिकारी अस्मिता गायकवाड, बाल प्रकल्प विकास अधिकारी राजेश गझलवाड, महिला बाल प्रकल्प विकास अधिकारी विद्या लोमटे, ग्राम विकास अधिकारी प्रशांत घुगे, पंचायत समिती सदस्य रविंद्र बोडके, माधव सरवदे, सुरेखा मुंडे, आशिष तोगरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पंचायत समितीचे सभापती सुरज पाटील आणि जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती उत्तम माने यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाल प्रकल्प विकास अधिकारी राजेश गझलवाड यांनी केले.














































