राष्ट्रसंतांनी भजनाच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण केली- सप्त खंजिरी वादक संदीपपाल महाराज

राष्ट्रसंतांनी भजनाच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण केली- सप्त खंजिरी वादक संदीपपाल महाराज
**********
भोकर( तालुका प्रतिनिधी) गावामध्ये लोकांचा एकोपा राहावा, संघटन शक्ती असावी, व्यसनाधीनता गावात नसावे, सर्वांनी उद्योगी बनावे यासाठीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेसारखा ग्रंथ लिहिला भजनाच्या माध्यमातून त्यांनी समाजात जागृती निर्माण केली क्रांती घडवली असे विचार गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक सप्त खंजेरी वादक संदीप पाल महाराज यांनी निमटेक येथे बोलताना मांडले.
गावे स्वच्छ आणि सुंदर बनली पाहिजे, स्वच्छता अभियान गावात राबवून गाव स्वच्छ केले पाहिजे, युवकांची शक्ती चांगल्या कार्याकडे वळली पाहिजे यासाठी सामाजिक प्रबोधन म्हणून निमटेक ता. उमरी येथे सप्त खंजिरी वादक गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक संदीप पाल महाराज यांच्या राष्ट्रीय कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी आपल्या प्रभावी वाणी मधून संदीप पाल महाराज यांनी ग्रामस्थांसमोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचार मांडले जलसंधारण करा वृक्षारोपण गावात करा आई-वडिलांची सेवा करा छ. शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांची जोपासना करा असे सांगून शेतकरी राजा संकटात आहे त्याला आधार देण्याची गरज आहे, आजचा युवक व्यसनाधीन बनत चाललाय म्हणून संस्कारित बनण्याची गरज आहे, मोबाईल मुळे मोठे नुकसान होत चालले आहे, आजच्या शिक्षण घेत असलेल्या युवतीनी आई-वडिलांची मान ताठ राहील असे वागावे, शिक्षण घेऊन उच्च पदस्थ बनावे, अंधश्रद्धा दूर करावी, स्त्रीभ्रूणहत्या करू नका, मुलगी वाचवा असा संदेशही शेवटी महाराजांनी दिला. सुनील मठपती यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास पत्रकार बी. आर. पांचाळ, गणेश गुरुजी, अवधूत राजुरे यांच्यासह गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते