छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवरून उसळला जनसागर! देवणीत प्रचंड मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवरून उसळला जनसागर! देवणीत प्रचंड मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन
देवणी प्रतिनिधी –देवणी तालुक्यातील कोनाळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर २६ मे रोजी देवणी शहरातील बोरोल चौकात भव्य मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारों शिवप्रेमी, सामाजिक संघटनांचे सदस्य, युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले.
२३ मे रोजी कोनाळी येथे काही समाजकंटकांनी महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दगडफेक केली. तसेच, गावातील लोकांवर अवमानास्पद भाषा वापरली गेली. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उठली. पोलिसांनी FIR क्रमांक 0177 नोंदवून आरोपींवर कारवाई केली असली, तरी दोन्ही आरोपी अल्पावधीतच जामिनावर सुटले.
या कारणास्तव झालेल्या आंदोलनात सहभागी नागरिकांनी आरोपींना कठोर शिक्षा द्यावी आणि त्यांच्या मागील गुन्हेगारी इतिहासाचा विचार करून त्यांना लातूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून तडीपार करावे, अशी ठाम मागणी केली. त्यांनी म्हटले की, केवळ कठोर कारवाईनंतरच कोणाळी गावात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होईल.
तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांसमोर सादर करण्यात आलेल्या निवेदनात या सर्व मागण्या स्पष्ट केल्या गेल्या आहेत. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, शिवाजी महाराजांच्या अपमानासारख्या घटना सहन केल्या जाणार नाहीत आणि योग्य ती कार्यवाही होईपर्यंत संघर्ष कायम राहील.
प्रशासनाकडून या घटनेची गांभीर्याने दखल घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.