छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना – समाजकंटकांवर गुन्हे दाखल करा नाहीतर जनआंदोलन उभारू!
शिवप्रेमी संतप्त – उदगीर पोलिस ठाण्यात निवेदन सादर

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना – समाजकंटकांवर गुन्हे दाखल करा नाहीतर जनआंदोलन उभारू!
शिवप्रेमी संतप्त – उदगीर पोलिस ठाण्यात निवेदन सादर
उदगीर, २३ मे (प्रतिनिधी) –छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू! मात्र आज सकाळी मौजे कोणाळी (ता. देवणी) येथे काही समाजकंटकांनी हा मानबिंदू पायदळी तुडवण्याचा निर्घृण प्रकार केला. पुतळ्यावर निळा झेंडा लावला, चपलेने मारहाण केली, तसेच दगड भिरकावून उघडपणे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. छत्रपतींचा पुतळा म्हणजे स्वाभिमानाचे प्रतीक आहे, आणि अशा प्रतीकाचा अवमान करणाऱ्यांना एकही क्षण माफ करता येणार नाही, अशा शब्दांत शिवप्रेमींनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. “शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक झाली नाही, तर लातूर जिल्ह्यासह राज्यभर तीव्र जनआंदोलन उभं करू!” असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
या संतापाच्या पार्श्वभूमीवर आज उदगीर शहर पोलिस ठाण्यात पोलीस अधीक्षक दिलीप गाडे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात आरोपींची तत्काळ ओळख पटवून त्यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
शिवप्रेमींनी दाखवलेला संताप हा केवळ पुतळ्याच्या विटंबनेचा नाही, तर महाराजांच्या विचारांची केलेली विटंबना सहन न करण्याचा निर्धार आहे. पुतळा फक्त धातूचा नसून तो मराठी जनतेच्या मनात असलेला जाज्वल्य आत्मा आहे, आणि त्या आत्म्यावर कुणीही घाव घालायचा प्रयत्न केल्यास त्याला लोकशक्तीच्या अंगाराचा सामना करावा लागेल, असा इशारा उपस्थितांनी दिला.
यावेळी सतीश पाटील मानकीकर, प्रदीप पाटील येणकी, प्रा. राहुल अतनुरे, प्रदीप सूर्यवंशी, केशव सूर्यवंशी, प्रा. मदन पाटील, सतीश आर. पाटील, दत्ता पाटील (छावा), प्रतीक कांबळे, नितीन बिरादार, सचिन पाटील दापकेकर, रणजीत माळेगाव, प्रवीण भोसले, संदीप पाटील, पिंटू बिरादार, सतीश पाटील (हिपळणारी), सुनील वाघमारे, विजय पाटील, राजकुमार माने (संभाजी ब्रिगेड), गिरीश सूर्यवंशी, प्रशांत जगताप, विशाल दाडगे, दीपक मोरे, मनोहर पाटील, आशिष हुरुसनाळे यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते.