राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया सन 2025
उन्हाळी तीळ पिकाचे प्रमाणित बियाणे मिळणार 100 टक्के अनुदानावर

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया सन 2025
उन्हाळी तीळ पिकाचे प्रमाणित बियाणे मिळणार 100 टक्के अनुदानावर
लातूर, दि. 9 (जिमाका) : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) हे खाद्यतेलांच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पिकाची उत्पादकता वाढ व सुधारित वाणांच्या प्रसारासाठी उन्हाळी हंगाम 2025 करिता लातूर जिल्ह्यातील निवड केलेल्या लाभार्थ्यांना उन्हाळी तिळासाठी हेक्टरी अडीच किलो प्रमाणित बियाणे केंद्र शासनाच्या 100 टक्के अनुदानावर वितरीतकरण्यात येणार आहे.
यासाठी प्रति लाभार्थी किमान 0.20 हेक्टर व कमाल 1 हेक्टर मर्यादित लाभ देय आहे. शासकीय बियाणे पुरवठादार संस्थांचा तिळासाठी 500 ग्रॅम किंवा 1 किलो याप्रमाणे पॅकिंगसाईज आहे. शेतक-यांना बियाणाच्या पॅकिंग साईजनुसार प्रमाणित बियाणे वितरीत करण्यात येईल. त्यामुळे क्षेत्रानुसार आवश्यक बियाण्यापेक्षा पॅकिंग साईज नुसार अधिकचे बियाणे परिगणित होत असल्यास यासाठीची रक्कम शेतकऱ्यांनी स्वहिश्याने भरावी लागेल. उन्हाळी तीळ पिकाच्या बियाण्याचा लाभ घेण्यासाठी http://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर प्रमाणित बियाणे वितरण, प्रात्याक्षिके, फ्लेक्झी घटक औषधे आणि खते या शीर्षकाअंतर्गत सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 100 टक्के अनुदानावर प्रमणित बियाणे वितरण या घटकासाठी अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक आहे. लाभार्थी निवड लक्षांकाच्या अधिन राहून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर करण्यात येणार आहे. त्यामुळे या घटकासाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी अर्ज करावेत आणि लाभ घ्यावा असे आवाहन लातूर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.














































