उदगीर बसस्थानकात गोंधळाचे साम्राज्य – प्रशासनाचा गलथान कारभार उघड!

उदगीर बसस्थानकात गोंधळाचे साम्राज्य – प्रशासनाचा गलथान कारभार उघड!
उदगीर: शहरातील बसस्थानकाच्या व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. फलक क्रमांक एक गायब असून, घोषणांमध्ये मात्र त्याचा सातत्याने उल्लेख केला जात आहे, त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक नियंत्रक कक्षातील कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असून, प्रत्येक प्रवाशाला तोंडी मार्गदर्शन करण्याची वेळ आली आहे. एवढे होऊनही कर्मचारी संयमाने आपली जबाबदारी पार पाडत आहेत, मात्र प्रशासन मात्र कानाडोळा करत आहे.
प्रवाशांचा संभ्रम – फलक नाही, दिशादर्शन नाही!
बसस्थानकात फलक क्रमांक एक नसल्याने प्रवाशांना बस कुठून सुटते, कुठे जावे, कोणता मार्ग कुठे आहे याचा थांगपत्ताच लागत नाही. बसस्थानक व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती उद्भवली असून, त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे.यामुळे वाहतूक नियंत्रक कक्षातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. प्रत्येक प्रवाशाला बस स्थानकातील योग्य दिशेची तोंडी माहिती द्यावी लागत आहे, यामुळे त्यांचा वेळ वाया जात असून, गर्दीचा गोंधळ अधिकच वाढत आहे.
अहमदपूर-लातूर पॉईंटवर बसण्यासाठीही व्यवस्था नाही!
अहमदपूर-लातूर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बसण्यासाठी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. उन्हाच्या झळांमध्ये प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत असून, ही स्थिती त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.
नवीन इमारतीचे काम रखडले, सुविधांची वानवा!
उदगीर बसस्थानकाच्या नव्या इमारतीचे काम मागील दीड वर्षांपासून सुरू असतानाही अद्याप अपूर्ण आहे. परिणामी, प्रवाशांना कोणत्याही सुधारित सुविधा मिळत नाहीत. बसस्थानकाची अवस्था पाहता प्रशासनाच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होते.
उन्हाळ्याचा तडाखा – पत्र्याच्या शेडमध्येही उष्णतेचा त्रास
सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा असताना बसस्थानकावर प्रवाशांसाठी पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे, मात्र त्याचा फारसा उपयोग होत नाही. उष्णता पत्र्याच्या शेडखाली अधिकच वाढत असून, वारा न मिळाल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
प्रशासनाचे ढिसाळ नियोजन आणि दुर्लक्ष
उदगीर बसस्थानकाची परिस्थिती पाहता प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. फलक बसवण्यासारखी साधी गोष्ट देखील प्रशासन करू शकत नाही, तर मोठ्या सुधारणा कधी होतील? बसस्थानकाच्या व्यवस्थापनाकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही, तर नागरिकांचा रोष अधिकच वाढेल.