हिंदू संघटनाची गरज – बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री यांचे परखड मत

हिंदू संघटनाची गरज – बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री यांचे परखड मत
भोकर (बी. आर. पांचाळ) – महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाने पावन झालेली आहे. वारकरी संप्रदाय, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा अनेक संघटना हिंदुत्वासाठी कार्यरत आहेत. मात्र, भारतातील हिंदूंनी जात-पात भेदभाव विसरून संघटित होण्याची गरज आहे, असे परखड मत बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी पिंपळगाव (ता. हदगाव) येथील शिव महापुराण कथा सोहळ्यात व्यक्त केले.
पिंपळगाव येथे 6 मार्च ते 13 मार्च दरम्यान 108 कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. स्वामी राजेंद्र दास देवाचार्य महाराज (वृंदावन धाम) यांच्या रसाळ वाणीतून होणाऱ्या कथेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित आहेत. 10 मार्च रोजी मध्यरात्री 12 वाजता लाखोंचा जनसमुदाय धीरेंद्र शास्त्री महाराजांना ऐकण्यासाठी जमला होता.
प्रचंड जनसमुदायासमोर बोलताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले:
“छत्रपती शिवाजी महाराजांनी वाईट कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीचा नाश केला. आमचे आराध्य दैवत श्रीरामचंद्र प्रभू आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आम्ही कोणताही वाद निर्माण करत नाही. मात्र, हिंदू धर्मावर कुणी घात करीत असेल, तर त्याला प्रतिघात करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आमची संस्कृती आणि परंपरा जपण्याचे काम आम्ही करू. आता हिंदूंनी संघटित होण्याची वेळ आली आहे. देशात 150 कोटी हिंदू असूनही, ते जात-पात भेदांमध्ये विभागले गेले आहेत. जर आपण संघटित झालो नाही, तर भविष्यात परिस्थिती गंभीर होऊ शकते.
त्यांनी पुढे आवाहन केले की, “प्रत्येक हिंदूच्या घरासमोर गाय बांधली गेली पाहिजे, तीलक लावण्याची आणि आई-वडिलांना प्रणाम करण्याची लाज वाटता कामा नये.” हिंदूंना जागवण्यासाठी मी कार्य करतोय, आणि जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत हे काम चालूच राहील. छत्रपती शिवाजी महाराजांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा माझा निर्धार आहे.”
या कार्यक्रमात भाविकांनी विठ्ठलाच्या भजनावर ठेका धरला, आणि युवकांमध्ये उत्स्फूर्त ऊर्जा पाहायला मिळाली.