वीज नसल्याने त्रस्त मादलापुर – ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा
१४ गावांचा बळी ठरतोय मादलापुर?

वीज नसल्याने त्रस्त मादलापुर – ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा
१४ गावांचा बळी ठरतोय मादलापुर ?
उदगीर प्रतिनिधी, एकमुख न्यूज
www.ekmukh.com २६ मे: मौजे मादलापुर (ता. उदगीर, जि. लातूर) येथील ग्रामस्थांनी वीजपुरवठ्याच्या वारंवार खंडित होणाऱ्या समस्येमुळे संतप्त होत महावितरण कार्यालयासमोर आत्मदहनासारखा टोकाचा निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मादलापुरमध्ये वीजपुरवठा अत्यंत अस्थिर असून, दिवसातून अनेक वेळा वीज गायब होते. सलग एक ताससुद्धा वीज उपलब्ध होत नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.
या अघोषित भारनियमनामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पंप बंद असल्याने नळांना पाणीच येत नाही. शिवाय, गावातील पीठ गिरण्या बंद पडल्यामुळे अन्नधान्य दळणेही कठीण बनले आहे. पावसाळा सुरू झाल्याने अंधारात साप, विंचूंसारख्या विषारी प्राण्यांचा धोका वाढला असून नागरिक भयभीत आहेत.
विशेष म्हणजे, मादलापुर हे गाव अर्बन क्षेत्रात मोडत असूनही येथे ग्रामीण भागासारख्या असुविधा आहेत. मादलापुरसोबत आणखी १३ गावांना एकाच वीजपुरवठा योजनेत जोडण्यात आले आहे. यातील कुठल्याही एका गावात बिघाड झाला तरी संपूर्ण १४ गावांचा वीजपुरवठा खंडित होतो. हे अतिशय अन्यायकारक असल्याची ग्रामस्थांची भावना आहे.
ग्रामस्थांनी पुढील मागण्या लावून धरल्या आहेत:
१. मादलापुर गावाचा वीजपुरवठा इतर १३ गावांपासून स्वतंत्र करावा.
२. सलग व नियमित वीजपुरवठा सुरू ठेवावा.
३. पूर्वीप्रमाणे २४ तास वीजपुरवठा त्वरित सुरळीत करावा.
या मागण्या २० दिवसांच्या आत पूर्ण न झाल्यास, आम्ही महावितरण कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा विचार करीत आहोत, असा इशारा ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात दिला आहे. या प्रसंगी उद्भवणाऱ्या कोणत्याही अनुचित प्रकारास महावितरण जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.