उदगीरच्या व्यापाऱ्यांचा संताप उसळला : ‘नो हॉकर्स झोन’मध्ये 14 वर्षांचा गोंधळ कायम – 7 दिवसांत कारवाई न झाल्यास नगरपरिषद निवडणूक बहिष्काराची चेतावणी

उदगीरच्या व्यापाऱ्यांचा संताप उसळला : ‘नो हॉकर्स झोन’मध्ये 14 वर्षांचा गोंधळ कायम – 7 दिवसांत कारवाई न झाल्यास नगरपरिषद निवडणूक बहिष्काराची चेतावणी
उदगीर (प्रतिनिधी)
लक्ष्मीनारायण मंदिर रोड ते कॉर्नर रोड आणि जय जवान कॉर्नर ते भाजी मार्केट हा परिसर अधिकृत “नो हॉकर्स झोन” जाहीर करून तब्बल 14 वर्षे उलटली, मात्र फेरीवाले-हातगाड्यांचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका, ग्राहकांचा अडथळा आणि व्यवसायावर थेट परिणाम… या सर्व समस्यांविरोधात व्यापाऱ्यांनी वारंवार तक्रारी, निवेदने, पत्रव्यवहार, आंदोलन, अगदी 2015 मधील बेमुदत बंददेखील केले. तरीही प्रशासनाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारली नाही, अशी व्यापाऱ्यांची तीव्र नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर उदगीरमधील सात प्रमुख व्यापारी संघटनांनी —
किराणा व भुसार असोसिएशन, सराफा असोसिएशन, कापड असोसिएशन, भांडी असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, मिशनरी असोसिएशन आणि श्रीराम प्रतिष्ठान — यांनी जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांना स्वतंत्ररित्या निवेदने देत प्रशासनावर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली.
“१४ वर्षे तक्रारी… तरी उपाय नाही — हा प्रशासनाचा निष्काळजीपणा!”
व्यापाऱ्यांच्या मते हा भाग अतिसंवेदनशील असून, पूर्वी येथे दंगलही झाली आहे. अतिक्रमणामुळे वाहतूक पूर्ण कोलमडते. रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवांना मार्गच मिळत नाही. ग्राहकांना ये-जा करता न आल्याने व्यवसायाचे नुकसान वाढत चालले आहे. प्रशासन काही दिवस कारवाई करते; पण पुन्हा पूर्वस्थिती निर्माण होते. परतफेरी थांबवण्यासाठी कधीही कायम यंत्रणा उभारली गेली नाही. व्यापारी म्हणतात, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत वारंवार पत्रव्यवहार केला, पण स्थानिक प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलेच नाही. व्यापाऱ्यांचा संयम आता संपत चालला आहे.”
व्यापाऱ्यांचा अंतिम इशारा : 7 दिवसांत कायमस्वरूपी कारवाई करा — अन्यथा निवडणूक बहिष्कार
संघटनांनी प्रशासनासमोर ठाम मागण्या मांडल्या —1. नो हॉकर्स झोनमधील अतिक्रमण पूर्णपणे हटवावे. 2. परतफेरी रोखण्यासाठी संयुक्त पथक व दंडात्मक कारवाई कायमस्वरूपी सुरू ठेवावी. 3. अतिसंवेदनशील परिसरात कायम पोलिस बंदोबस्त ठेवावा. आणि इशारा दिला “ही कामे पुढील 7 दिवसांत न झाल्यास उदगीर व्यापारी वर्ग एकमुखीपणे नगरपरिषद निवडणूक बहिष्कार करेल.” संघटनांनी स्पष्ट केले की हा निर्णय राजकीय नसून, हा व्यवसाय, सुरक्षा, वाहतूक आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठीचा लढा आहे.
सातही संघटनांचा ‘खडा इशारा’
व्यापाऱ्यांचे मत स्पष्ट — “आम्ही अर्ज देत राहू आणि प्रशासन फक्त दाखवणूक करत राहील… ही परिस्थिती मान्य नाही. उदगीर शहराच्या सुव्यवस्थेसाठी निर्णय 7 दिवसांत व्हायलाच हवा. अन्यथा आंदोलन, व्यापारबंद आणि निवडणूक बहिष्कार हे पर्याय खुले आहेत.” नागरिकांचा आवाज : “रस्त्यावर गोंधळ, अपघात, चालणेही कठीण” नागरिकांच्या म्हणण्यानुसार अतिक्रमणामुळे रस्ते 60% व्यापले जातात. वाहनधारकांना दररोज चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती. महिलांना, विद्यार्थ्यांना सरळ चालत जाणेही कठीण. संध्याकाळी गर्दीत अपघातांची शक्यता वाढते.
व्यापारी नेतृत्व एकत्र — मोठी नावे पुढे सरसावली
या आंदोलनात उदगीरमधील प्रमुख व्यापारी पुढाकार घेत आहेत. त्यामध्ये उमानाथ कोटलवार, विकास पत्तेवार, प्रशांत मांगुळकर, योगेश चिद्रेवार, कैलास देबडवार, प्रशांत चंडेगावे, योगेश जळकोटे, राजू चिद्रेवार, राजू मुक्कावार, सुहास रंगदळ, पाटील ज्वेलर्स (प्रतिनिधी), ज्ञानेश्वर मारमवार, सतीश पाटील, पियुष चिद्रेवार, अभिजीत पाटील, प्रदीप पत्तेवार, गणेश चिद्रेवार, राहुल मद्रेवार, श्रीपाद चिद्रेवार, विकास रंगदळ, अक्षय कोटलवार, विजय मांगुळकर, रोहित बदलानी, विकास चिद्रेवार आणि स्वरूप महिंद्रकर यांचा समावेश आहे.या सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रित भूमिका घेत प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला आहे की —
“आता उदगीरला कायमस्वरूपी उपाय हवा — आणि तो तात्काळ हवा!”















































