जगताच्या कल्याणासाठी वैश्विक सुखाचे मागणे म्हणजे पसायदान चैतन्य महाराज देगलूरकर यांची मानवतला प्रवचनमाला

जगताच्या कल्याणासाठी वैश्विक सुखाचे मागणे म्हणजे पसायदान चैतन्य महाराज देगलूरकर यांची मानवतला प्रवचनमाला
मानवत सौ ममता चिद्रवार : ज्ञानेश्वरीला वस्त्र गुंडाळताना म्हणण्यासाठीचा मंत्र म्हणजे पसायदान नसून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी जगातल्या प्रत्येक जीवाची विचारशीलता पारमार्थिक दृष्टीने प्रगल्भ व्हावी यासाठी सद्गुरू चरणी मागितलेले मागणे म्हणजे पसायदान होय असे प्रतिपादन प्रसिद्ध प्रवचनकार चैतन्य महाराज देगलूरकर यांनी येथे मंगळवारी ता 15 केले.
शहरातील शिवाजीनगर भागातील दक्षिणमुखी जागृत हनुमान मंदिराच्या सभागृहात स्वामी दिव्यानंद सत्संग परिवार द्वारा आयोजित पसायदान या विषयावर आयोजित तीन दिवसीय प्रवचनमालेतील पहिल्या दिवशी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात साधना परंपरा मागितली असून पसायदान हे ज्ञानेश्वरीचा भाग असले तरी, स्वतंत्र स्तोत्रा एवढे महत्त्व पसायदानाला आहे. पसायदानातील प्रत्येक शब्दाला ज्ञानेश्वरीतील सिद्ध करणाऱ्या ओव्या असून पसायदानात मानवी जीवनाच्या उत्कर्षाचा चढता आलेख आहे. माऊलीला पसायदानाच्या माध्यमातून समाज बदलणे अपेक्षित असून व्यक्ती कल्याणातून समस्ती कल्याणाचा मार्ग म्हणजे पसायदान असल्याचे त्यांनी सांगितले. पसायदान हे जगाच्या पाठीवरचे सर्वोत्तम मानसशास्त्र असून यामध्ये वृत्ती परिवर्तन सांगितले असून माणूस जेव्हा वृत्तीने बदलतो तेव्हा कृती परिवर्तन राहत नाही. माऊली साधन मागत नाही तर साध्य मागतात. आपल्या मध्ये विचार नसेल तर मानव व जनावरात अंतर राहत नाही, यासाठी ज्ञान विचार व विवेक आवश्यक आहे. आणि या विचाराचा विकास करण्याकरीता सध्याची जाणीव, साध्य प्राप्त करून देणाऱ्या साधनेचे नियतत्व, साधन कळले की साधनेची तीव्रता, साधनेत येणाऱ्या प्रतिबंधाची जाणीव व प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी साधनांचे ज्ञान होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवचनास महामंडलेश्वर स्वामी मनीषानंदपुरी, स्वामी महेशानंदपुरी, स्वामी रसानंद पुरी, स्वामी हरिश चैतन्य, स्वामी शिवेंद्र महाराज, पंडित महाराज डाके, भारतीताई महाराज, उमेश महाराज दशरथे, रामराव महाराज हेंडगे यांच्यासह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.